इतिहासात पहिल्यांदाच करोनामुळे सेवा देण्यात खंड
पुणे – दळणवळण सेवेतून देशाला जोडणाऱ्या भारतीय रेल्वेला गुरूवारी 167 वर्षे पूर्ण झाली. इंग्रजांच्या काळामध्ये सुरू झालेली रेल्वे, कोणत्याही आपत्तीला तोंड देत धावत आहे. पण, रेल्वेच्या प्रवासी गाड्या वाढदिवसादिवशीच धावू शकल्या नाहीत.
सध्याचे मुंबई म्हणजेच पूर्वीच्या बोरीबंदर स्थानकांतून सन 1853 मध्ये रेल्वेच्या पहिल्या प्रवासी गाडीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. 16 एप्रिल 1853 मध्ये दुपारी साडेतीन वाजता ही गाडी दिमाखात धावली होती. त्यावेळी गाडीला विशेष फैरींची सलामी दिली होती. सुरुवातीला “साहिब’, “सिंध’ आणि “सुलतान’ या तीन इंजिनांचा प्रयोग केला होता. बोरीबंदर ते ठाणे हे 34 किमीचे अंतर या गाडीने 1 तास 15 मिनिटांच्या कालावधीत पार केले होते. आज यामध्ये आमूलाग्र बदल झाला असून पुणे-मुंबई असे अंतर सुमारे अडीच तासांच्या कालावधीत रेल्वेगाडी सहज कापते. या गाडीच्या उद्घाटनावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. यादिवशी 14 डब्यांच्या गाडीतून 400 निमंत्रितांनी पहिला प्रवास केला होता आणि ही भारतीय रेल्वे जगातील प्रमुख प्रवासी यंत्रणांमध्ये अग्रक्रमाने गणली जाते.
तर सन 1887 मध्ये “व्हिक्टोरिया टर्मिनस’ उभारण्यात आले. सन 1996 मध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि सन 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे त्याचे नामकरण करण्यात आले. यापूर्वी कधीही रेल्वे सेवा खंडीत झाली नाही. विशेषत: पूर, बॉम्बस्फोट, युद्ध आदी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीतही रेल्वे सातत्याने धावली आहे. भारतामध्ये प्रवासी वाहतुकीचे रेल्वे यंत्रणेचे मोठे जाळे पसरले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक स्थगित केली आहे. परंतु या कालावधीत वस्तुंचा तुटवडा पडू नये, म्हणून मालगाड्यांद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात येत आहे.