शेकडो कामगार बेरोजगार : अद्यापही आर्थिक घडी विस्कटलेलीच
पिंपरी – पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांना करोनाचा मोठा आर्थिक फटका बसला. यामुळे उद्योगनगरीची अद्यापही आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरला सर्वाधिक फटका बसला आहे.
उद्योगनगरीत सुमारे 11500 लघु, मध्यम, सूक्षम व मोठे उद्योग आहेत. यामध्ये सर्वाधिक उद्योग दुचाकी, चारचाकींचे विविध सुटे भाग तयार करणारे आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चला देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर कधी नव्हे अशी भूतो ना भविष्यती परिस्थिती निर्माण झाली. उद्योगनगरीतील सर्वच उद्योगांची चाके थांबली. कामगारांचे उत्पन्नच थांबल्याने उपासमार होऊ नये, याकरिता विशेष बस व रेल्वेने हे कामगार गावी निघून गेले. हजारो कामगारांनी तर शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत आपले गाव गाठले.
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे पुन्हा कधी सुरु होतील, याबाब उद्योजकांच्या मनात मोठी धास्ती होती. मनुष्यबळ नाही, वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यो कच्चा माल नाही, महावितरणने सरासरी दिलेली वीजबीले यामुळे उद्योजक मेटाकुटीला आले होते.
राज्यातील उद्योग थांबल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका बसल्याचे जाणवताच 13 मे 2020 रोजी राज्य सरकारने 30 टक्के मनुष्यबळावर उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली. मात्र, तरीदेखील मनुष्यबळच नसल्याने उद्योगांच्या चाकांना अपेक्षित गती पकडता आली नाही. त्यानंतर जुलै महिन्यात उद्योगांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली. हे प्रयत्नदेखील उद्योगांची विस्कळीत घडी सावरू शकले नाहीत.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या मतानुसार, लॉकडाऊनच्या काळात उद्योगनगरीतून सर्वाधिक स्थलांतर परप्रांतीय कामगारांचे झाले आहे. त्याचा परिणाम लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतरही जाणवत आहेत. याशिवाय महावितरणने दिलेली सरासरी वीज बिले आणि कच्च्या मालाच्या वाढत्या दरामुळे उद्योगांपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे.