कोपरगाव -कोपरगाव तालुक्यात बुधवारी (दि.3) सायंकाळी सहावाजल्यापासून जोराचा वारा व पावसास प्रारंभ झाला. या वादळाने व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांसह घरांचे, जनावरांचे व विजेच्या खांबांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी तालुक्यात दिवसभर जोराचा वारा वाहत होता. तसेच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी जोराचा वारा व पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह साठवलेला कांदा, देर्डे कोऱ्हाळे येथील शेतकरी आशुतोष संतोष आभाळे यांचे दोन एकर व माहेगाव देशमुख येथील शिवाजी किसन काळे यांच्या 10 गुंठे शेतीतील पॉलिहाऊसचे नुकसान झाले.
महावितरण विभागाचे तालुक्यातील तब्बल 27 विजेचे खांब, दोन डीपी, 70 विद्युत वाहक तारा गाळे वादळी वाऱ्याने खाली कोसळले. यात महावितरणचे पाच लाखांपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाले. कोपरगाव शहर परिसरात तीन उच्च दाब वाहिन्यांचे खांब व 15 लघु दाब वाहिन्यांचे खांब कोसळले. सहा ठिकाणचे डीपीचे संच कोसळले, तर 24 ठिकाणी तारा तुटल्या. ग्रामीण भागात 80, तर शहरी भागात 19 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. यात काहींच्या घराचे नुकसान झाले आहे.
जेऊर कुंभारी, बक्तरपूर, घारी, जवळके, बहादरपूर, काकडी, कान्हेगाव हिंगणी, या गावांमधील काही ग्रामस्थांची कच्ची व पक्की घरे पडली आहेत, तर चासनळी, देर्डे कोऱ्हाळे, माहेगाव देशमुख येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. अंशतः कच्ची व पक्की अशा 20 घरांची पडझड होऊन पत्रे उडाले आहेत. शहरातील गावठानामधील व उपनगरातील काही घरांची पडझड होवून पत्रे उडाले आहेत.
वादळामुळे मोठे नुकसान होऊ नये, म्हणून प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याने जीवित हानी टळली आहे. आज वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने सुरू होते.
काळे कारखान्याची चिमणी कोसळली
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलची चिमणी कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारखान्याचे शेड, साठवलेला कोळसा व नव्याने बांधलेल्या चिमणीसह दोन कोटी 60 लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा तपास सरून पंचनामा करण्यात आला आहे.