बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणारी टोळी जेरबंद
नगर -शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प, एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच तालुका पोलीस ठाणे हद्दीतून अनेक दुचाक्या चोरी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. कोतवाली पोलिसांनी नुकत्याच पकडलेल्या टोळीकडून शहरातील दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होणार असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दुचाकी चोरणे व चोरलेल्या दुचाकीचे बनावट कागदपत्रे तयार करून दुचाकी बाजारामध्ये विक्री करणारी टोळी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांच्या पथकाने टोळी जेरबंद केली.
अक्षय विठ्ठल जंगम (वय-20 रा. भोसले आखाडा, नगर), समीर खोजा शेख (रा. झरेकर गल्ली, नगर), गोरख भारत सुरवाडे (वय- 21 रा. शिवाजीनगर), आकाश अरुण दळवी (वय- 21 रा. केडगाव) असे या दुचाकी चोरीच्या टोळीतील आरोपींचे नावे आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे. दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सुचना संदीप मिटके व विकास वाघ यांनी गुन्हे प्रगटीकरण शाखेचे उपनिरीक्षक शिरसाठ यांना केल्या होत्या. शिरसाठ यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत चौघांना अटक केली. मात्र या गुन्ह्यात अजूनही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुचाकी चोरीच्या टोळीचा मुख्य सुत्रधार अक्षय जंगम हा आहे. त्याने इतरांच्या मदतीने शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचे नियोजन केले होते.दुचाकी चोरून व चोरलेल्या दुचाकीची विल्हेवाट लावण्याची पद्धतशीर व्यवस्था या भामट्यांनी केली होती. चोरीच्या दुचाकीचे पूर्ण कागदपत्र बनावट करून ते खरे कागदपत्रे आहे. असे, भासवून दुचाकीची विक्री केली जात असे.
चोरीच्या अशा अनेक दुचाकी त्यांनी यापूर्वी बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केल्या आहेत. या टोळीतील आकाश अरुण दळवी (रा. केडगाव) हा पूर्वी एका खाजगी फायनान्स कंपनीत कामाला होता. तो सुशिक्षित असल्याने व एका फायनान्स कंपनीत काम करत असल्याने त्यांचा या बनवेगिरीचा पूर्ण अभ्यास झालेला होता. चोरीची दुचाकी आणल्यानंतर या दुचाकीचे बनावट आरसी बुक केले जायचे.
आरसी बुकच्या मुळ कलर कॉफीवर चोरीच्या दुचाकीचा इंजन व चेसी नंबर टाकला जायचा. नंबर टाकताना एका अंकाचा फक्त बदल केला जात असे. हे बनावट आरसी बुक लक्षात येत नसल्याने ते चोरीची दुचाकी खरेदी करीत होते.