मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची घटका जवळ आली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे . सायंकाळपर्यंत बिहारचा नवीन बादशाह कोण? हे स्पष्ट होईल. महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
माहितीनुसार, मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आघाडीवर असलेली महागठबंधन आता पिछाडीवर पडली आहे. तर भाजपप्रणित एनडीएने आता जवळपास ११७ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी १२२ जागांची गरज आहे. तर महाआघाडीला ९५ जागा मिळाल्या आहेत.
तर शिवसेनेची एकाही जागेवर अद्याप आघाडी सुद्धा उघडली नाही. त्यामुळे सेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचे चिन्ह आहे.
दरम्यान, बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली होती.