Tejashwi Yadav: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान यानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत “आता बिहार गुजरातकडून चालवले जाईल,” असा आरोप केला आहे. माध्यमांशी बोलताना यादव यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर टीका करत म्हटले की, त्यांनी भाजपला सत्तेत येण्याची संधी दिली असून, नव्या मुख्यमंत्र्यांची निवड ही जनतेची पसंती नसणार आहे. “महात्मा गांधींचा खून करणाऱ्या विचारसरणीच्या पक्षाला संधी दिली जात आहे. पूर्वी ‘बापू’चे नाव घेणारे मुख्यमंत्री आता नथुराम गोडसेच्या विचारसरणीला पाठबळ देत आहेत. कर्पूरी ठाकूर यांचा अपमान करणाऱ्यांना ते पुढे आणत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. Tejashwi Yadav हेही वाचा – सम्राट चौधरी यांचा RJD पासून BJP पर्यंतचा प्रवास; उद्या सकाळी 11 वाजता घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दरम्यान, बिहारसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी बिहार विधानमंडळ पक्षाच्या बैठकीत सम्राट चौधरी (Samrat Choudhary) यांची एकमताने नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर चौधरी हे बिहारमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. (Tejashwi Yadav) Tejashwi Yadav: “बिहारचा कारभार आता गुजरात चालवेल, नथुराम गोडसेच्या विचारसरणीला….”: तेजस्वी यादव यांची जोरदार टीका राज्यातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार (Nitish Kumar) (सुमारे २१ वर्षे) यांनी आज पटण्यातील लोक भवन येथे राज्यपाल सय्यद अता हसनैन (Syed Ata Hasnain) यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वी १० एप्रिल रोजी त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली होती. राज्यसभा सदस्यत्व स्वीकारणे हे त्यांच्या सर्व विधानमंडळांमध्ये (बिहार विधानसभा, बिहार विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा) काम करण्याच्या दीर्घकालीन इच्छेची पूर्तता असल्याचे मानले जाते. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये कुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजीनामा दिल्याचे सांगितले. “आम्ही अनेक वर्षे बिहारच्या जनतेची सेवा केली. आता पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सरकारला माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन राहील. पुढील काळातही राज्यात चांगले काम होईल आणि बिहार प्रगती करेल,” असे त्यांनी नमूद केले. या घडामोडींमुळे बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तासमीकरणात मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे.