Bihar Election 2025 | Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणूक 2205 मध्ये एनडीएने प्रचंड विजय मिळवला असून महागठबंधनला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, लोक जनशक्ति पार्टी (रामविलास पासवान), एलजेपी (आर) ने या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील ही पार्टी बिहारमध्ये चौथी सर्वात मोठी आणि एनडीएतील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे चिराग पासवान यांची बिहारमधील लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, चिराग पासवान बिहार सरकारमध्ये कोणती भूमिका निभावणार याबाबत चर्चांना जोर आला आहे. बीजेपी चिराग पासवान यांना कोणती जबाबदारी देईल? मिळालेल्या माहितीनुसार, “जर बिहारमध्ये यावेळी बीजेपीचा मुख्यमंत्री झाला, तर चिराग पासवान यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते. चिराग पासवान हे दलित समाजाचे प्रमुख नेते आहेत. त्याचबरोबर, नीतीश कुमार यांच्या जेडीयूलाही दलित समाजाचा मोठा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत, चिराग पासवान यांना उपमुख्यमंत्री बनवून बीजेपी जेडीयूचा दलित वोटबँक आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करू शकते. तसेच, चिराग पासवान तरुण आहेत. भविष्यात त्यांची केंद्रातील भूमिका किती मोठी असेल ते सांगता येत नाही. परंतु जर ते यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री बनले, तर पुढील पाच वर्षांनी ते मुख्यमंत्रीपदाचे बलाढ्य दावेदार म्हणून उदयास येऊ शकतात. चिराग पासवान यांनी किती जागांची मागणी केली होती? नीतीश कुमार यांना चिराग पासवान यांच्या पक्षाला १३–१४ पेक्षा जास्त जागा द्यायच्या नव्हत्या. मात्र चिराग ३५ जागांवर ठाम होते. शेवटी समन्वय साधून एलजेपी (आर) ने २८ जागांवर निवडणूक लढवली आणि या वेळी पक्षाला मोठे यश मिळाले. एनडीएच्या प्रचंड विजयामुळे चिराग पासवान यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांच्या पक्षाच्या यशामुळे ते बिहारच्या सत्तेत महत्त्वाची भूमिका निभावतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री पदाचा पर्याय सर्वाधिक चर्चेत आहे आणि त्यामुळे बिहारच्या पुढील राजकारणात चिराग पासवान हे केंद्रस्थानी असतील, असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, स्वतः चिराग पासवान कोणती जबाबदारी हातात घेणार हे पाहणे महत्वाचे आहे. गेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकली नाही : २०२० च्या विधानसभा निवडणुकीत चिरागच्या पक्षाने एनडीए आघाडीपासून वेगळे निवडणूक लढवली, ज्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. २०२० मध्ये लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) १३५ जागा स्वतः लढवल्या. पक्षाला ५.६८% मते किंवा अंदाजे २३.८३ लाख मते मिळाली, परंतु त्यांना फक्त एकच जागा मिळाली. ही बेगुसरायमधील मटिहानी विधानसभा जागा होती.