Bihar Election 2025 | Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बिहारमधील कोट्यवधी मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी महागठबंधनावर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा आहे. बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. सुरुवातीपासूनच निष्पक्ष न राहिलेल्या निवडणुकीत आम्हाला विजय मिळवता आला नाही. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाची आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल अभ्यास करून लोकशाही वाचवण्याचे प्रयत्न आणखी प्रभावी करतील,” असे ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “बिहारच्या जनतेच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून लोकशाहीला कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरुद्धची आमची लढाई सुरूच राहील. आम्ही निकालांचे बारकाईने विश्लेषण करून त्यामागील कारणे समजावून घेतल्यानंतर सविस्तर भूमिका मांडू.” “निराश होण्याची अजिबात गरज नाही. महागठबंधनास पाठिंबा देणाऱ्या बिहारच्या मतदारांचे आम्ही आभारी आहोत. आमचे प्रत्येक कार्यकर्ते हीच आमची खरी ताकद आहे. तुमची मेहनत आमचे बळ आहे. आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्यात कमीपणा आणणार नाही. संविधान आणि लोकशाही बचावासाठीचा हा संघर्ष आम्ही सुरूच ठेवणार आहोत. ही लढाई दीर्घ आहे आणि आम्ही ती पूर्ण निष्ठा, साहस आणि सत्यतेने लढत राहू.” असं ते म्हणाले. भाजपच बिहारमध्ये मोठा भाऊ ! बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप एनडीए (BJP) आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला असून भाजपने 102 पैकी तब्बल 90 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा जल्लोष सुरू आहे. तर, नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाला 84 जागांवर विजय मिळाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे एनडीए आघाडीत समसमान जागा लढवणारा भाजपच बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. ‘काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल…’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाकीत आज एका विधानसभेत आम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीतही मिळाल्या नाहीत. काँग्रेसचा निवडणुकीचा आधार केवळ निगेटिव्ह झाला आहे. चौकीदार चोर म्हणायचं, कधी ईव्हीईएमवर आरोप, कधी मतचोरीचा आरोप, कधी निवडणूक आयोगाला शिव्या घालणं, देशाच्या शत्रूचे अजेंडे समोर आणणं सुरू आहे. काँग्रेसकडे पॉझिटिव्ह व्हिजन नाहीये. आज काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस म्हणजे एमएमसी झाली आहे. ही काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस आहे. आणि काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा त्यावरच चालत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही दुसरा गट निर्माण होत आहे. हा गट निगेटिव्ह पॉलिटिक्सच्या विरोधात आहे. जे काँग्रेसचे नेते निगेटिव्हि पॉलिटिक्स घेऊन जात आहे, त्याच्या विरोधात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.