पटना – बिहार विधानसभा निवडणुक जवळ आली आहे. मतदारांचे मन वळवण्यासाठी सर्व पक्ष प्रचार सभा घेत आहेत. प्रचार सभेसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बांका जिल्ह्यातील अमरपूर विधानसभा मतदार संघात पोहोचले होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते.
यावेळी बोलताना नितीश कुमार यांनी जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत अशा तरूण मतदारांना लक्ष केलं आहे.
बिहारमध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले आहे, असे म्हणत नितीश कुमार यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालये बांधली जात आहेत. रोजगाराशी संबंधीत तांत्रिक शिक्षणावर सरकारचे लक्ष आहे. आतापर्यंत सरकार इयत्ता 12 उत्तीर्ण होणाऱ्या मुलींना 10 हजार रूपये तर पदवीनंतर 25 हजार रूपये देत असे. मात्र, आता ते वाढवून 12 वी नंतर 25 हजार तर पदवीनंतर 50 हजार रूपये करण्यात आले असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.
बिहारमध्ये नितीशकुमार हे गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहेत. यावेळी असे काही नवीन मतदार आहेत ज्यांनी लहानपणापासून नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री म्हणून पाहिले आहे. विशेषत: 18 ते 22 वयोगटातील तरूण मतदारांना लालूप्रसाद यांच्या सत्तेची फारशी माहिती नाही. कारण
जेव्हापासून त्यांना समजायला लागले तेव्हापासून नितीशकुमारच सत्तेत आहेत. त्यामुळे 15 वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती आणि नितीश कुमार यांच्या सत्तेत किती बदल झाले हे या तरूण मतदारांना सांगा असे नितीश कुमार यांनी प्रचार सभेत सांगितले.
नितीश कुमार म्हणाले की, जुणं बिहार कसं होतं, कशाप्रकारे रस्त्यांची अवस्था होती, वीजेची काय अवस्था होती ? तसेच मागील 15 वर्षात किती बदल झाले, हे
घरातील वडिलाधाऱ्या आणि तरूण मतदारांना सांगा. असे नितीश कुमार प्रचार सभेत म्हणाले.