औंध, दि. 13 (प्रतिनिधी) -“आझादी का अमृतमहोत्सव’च्या औचित्याने “हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत बाणेर येथे “नेटसर्फ नेटवर्क’च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. 120 फूट बाय 40 फूट इतक्या भव्य आकाराचा तिरंगा ध्वज “नेटसर्फ’ने आपल्या मुख्य कार्यालयावर लावत राष्ट्राला विक्रमी आणि वैशिष्ट्यपूर्ण, अशी सलामी दिली आहे.
“नेटसर्फ’ परिवाराने त्यांच्या बाणेर येथील मुख्यालयात एकत्र येत त्यांच्या संपूर्ण इमारतीला बाहेरून हा तिरंगा लावला. या भव्य तिरंगा ध्वजाचे अनावरण राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नेटसर्फ नेटवर्कचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सुजित जैन, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. एस के जैन, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पुनीत जोशी, संदीप खर्डेकर, संजय मालपाणी, शैलेंद्र कवडे, मनोज पोचट, केतन गानू, प्रदीप टेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तिरंग्यांपैकी हा एक आहे. नेटसर्फ कंपनीने आपल्या गेल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत हजारो भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत करून त्यांच्या उद्योजकतेस प्रोत्साहन दिले आहे.
अनोख्या पद्धतीने राष्ट्राला वंदन करण्याचा नेटसर्फ नेटवर्कचा प्रयत्न स्तुत्य आहे. भारतीयांच्या कल्पकतेने “हर घर तिरंगा’ या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, याचा आनंद वाटतो. इमारतीच्या भोवती सर्वात मोठा ध्वज लावल्याचा मला आनंद झाला.
– चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री
जर व्यक्तींना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले तर त्या त्यांचा कौशल्य विकास करून स्वत:ची स्वप्ने पूर्ण करू शकतात. त्यामुळेच या 75व्या खास स्वातंत्र्य दिनाला संपूर्ण नेटसर्फ परिवार एकत्र येऊन “ख्वाबों की आज़ादी’ वरील दृढ विश्वास साजरा करत आहे.
– सुजित जैन, ‘नेटसर्फ’ चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक