मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधीत असलेल्या कथीत महाराष्ट्र शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी विशेष पीएमएल कोर्टाने दखल घेतली आहे. त्यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत.
तसेच अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना कोर्टाने समन्स बजावले आहे. ईडीने जरंडेश्वर कारखाना प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. कोर्टाने समन्स दिल्याने अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा बँकेकडून जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर 826 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. मात्र, त्या कारखान्याची कवडीमोल दरानं विक्री राष्ट्रवादीच्या नेत्याच्या निकटवर्तीयांना करण्यात आल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलं आहे.
ईडीनं या प्रकरणी एप्रिलमध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं. मात्र, त्यातून अजित पवार किंवा त्यांच्या पत्नीचं नाव वगळण्यात आलं होतं. ईडीनं चार्जशीटमध्ये जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. चं नाव घेतलं होतं.
पैशांचं अवैधपणे हस्तांतरण करण्यात आल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलं आहे. मात्र, आता पुन्हा एकदा कोर्टाने याप्रकरणी विशेष दखल घेत अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना समन्स बजावले आहे.