मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची ३१ डिसेंबर रोजी शेवटची मुदत आहे. मात्र, मुदत संपत आली तरी अद्याप सुमारे ४५ लाख लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. प्रशासनाने नव्याने मुदतवाढ देण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केल्याने या महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात एकूण २ कोटी ३५ लाख लाभार्थी महिलांपैकी ३० डिसेंबरपर्यंत केवळ १ कोटी ८५ लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केले आहे. सुरुवातीला १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती, ती वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली होती. तरीही ४५ लाख महिलांनी ही प्रक्रिया का केली नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या मते, ई-केवायसीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देऊनही अनेक महिलांनी उदासीनता दाखवली आहे. अधिक उत्पन्न असलेले लाभार्थी किंवा सरकारी नोकरीत असूनही लाभ घेणारे ‘बोगस’ लाभार्थी उघड होण्याची भीती असल्याने अनेकजण ई-केवायसी टाळत असावेत, असा प्रशासनाचा कयास आहे. सध्या तरी मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित नाही. याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतच होऊ शकतो. मात्र, सध्याच्या भूमिकेमुळे ४५ लाख महिलांची धाकधूक वाढली आहे.