मुंबई : राज्यात तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना राजकीय धक्का देत शिवेसना-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी रविवारी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते. त्यानंतर आता पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरु झाला असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यात झालेल्या राजकीय बंडाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांच्या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यानुसर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत संख्याबळ आपल्याकडे जास्त असून पक्ष आणि चिन्ह याच्यावर आपलाच हक्क असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे अजित पवार यांच्यानंतर आता शरद पवार यांच्या गटाने देखील निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. त्यानुसार या गटाकडून देखील एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात पक्षच्या संघटनेवर आपला दावा सांगितला आहे. तसेच निर्णय घ्या अगोदर आमचंही म्हणणं ऐकून घ्या अशी विनंती या आयाचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकं कोणाच्या बाजूने निर्णय देते हे पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान,आज राज्यात एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी 11 वाजता बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. तसे व्हिपही बजावण्यात आले आहेत. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडले आहेत.