नवी दिल्ली – अमेरिकेसोबत पारस्पारिक व्यापार करारासंदर्भात चर्चा चालू आहे. नोव्हेंबरच्याअखेर पर्यंत या संदर्भात एखादी सकारात्मक बातमी मिळणार असल्याचा विश्वास निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून भारत- अमेरिके दरम्यान औपचारिक आणि अनौपचारिक पातळीवर बोलणी निरंतर चालू असल्याचे त्यांनी सांगितले. एका माध्यम समूहाने नेतृत्व विकास या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना ते म्हणाले की, भारत -अमेरिकेदरम्यान चर्चेत काही प्रमाणात अडथळे आले आहेत, हे खरे आहे. दोन्ही देश अनेक संवेदनाशील बाबीवर परस्परांना फायदेशीर भूमिका घेण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीत नोव्हेंबरअखेर या आघाडीवर सकारात्मक घडामोड घडेल. भारत अमेरिकेदरम्यान काही मतभेदाचे मुद्दे समोर आल्यानंतरही अमेरिकेतील कंपन्यांनी आणि गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक वाढविली आहे. अमेरिकन उद्योगांना भारताचे असलेले आकर्षण कायम आहे. दुसर्या महायुद्धानंतर जागतिक व्यापारात कमालीची सकारात्मक परिस्थिती होती. मात्र आता प्रत्येक देशात राष्ट्रवाद वाढल्यामुळे अनेक देश व्यापारात अडथळे निर्माण करीत आहेत. अशा परिस्थितीत एकूणच थेट परकीय गुंतवणुकीवर जागतिक पातळीवर परिणाम झाला आहे. असे असले तरी भारत याला बर्याच प्रमाणात अपवाद ठरत आहे. कारण भारतातील गुंतवणुकीवर किंवा विकासदरावर इतर देशांइतका परिणाम झालेला नाही. चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही – जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचे योगदान 20 टक्के आहे. अशा परिस्थितीत भारताला चीनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्याचीन बरोबर व्यवहार चालूच ठेवावा लागणार असल्याचे ते म्हणाले. जीएसटीनंतर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी एक मोठी सुधारणा महिन्याच्या अखेर जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे योगदान सध्याच्या 17 टक्क्यावरून 25% होण्यास मदत होईल.