मुंबई : 18 जून पासून पंढरीच्या वारीला सुरुवात होणार आहे. राज्यभरातून अनेक वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. यादरम्यान राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. काय आहे शासन निर्णय? पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 18 जून ते 10 जुलैदरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जात असतात. विठ्ठल नामाचा जयघोष करत हे वारकरी दिंड्या घेऊन पंढरपूरला जातात. पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी अभूतपूर्व असा सोहळा पाहायला मिळतो. वारकऱ्यांसाठी हा खास सोहळा असतो. वर्षभर वारकरी या क्षणाची वाट पाहात असतात.