Today Top 10 News: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये ‘प्रवेशबंदी’, वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या…

नगरपरिषद, नगरपंचायतचा निकाल 21 डिसेंबरलाच –
नागपूर उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम –
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सोबतच विरोधातली याचिकाही फेटाळून लावली. त्यामुळे मतदारांचे लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरांतील सत्तांतराविषयीची उत्सुकता वाढली आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच नागपूर खंडपीठाने मतमोजणी पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी –
खात्यात येणार 3000 रुपये?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात 1500 नाही, तर थेट 3000 रुपये सन्माननिधी जमा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा न झाल्याने, सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे दोन हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे ही रक्कम जमा होण्यास विलंब झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी दोन महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली होती. सूत्रांनुसार, पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा करू शकते. तथापि, सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांनी ती लवकर करून घेणे गरजेचे आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये प्रवेशबंदी-
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट –
महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. विशेषत: ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटातील वाद विकोपाला गेलाय. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर, महायुतीच्या समन्वय समितीने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यापुढे घटक पक्षांतील कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, वरिष्ठ नेत्यांमध्ये (मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री) मनभेद नाहीत, मात्र स्थानिक पातळीवरील वाद मिटवण्यासाठी लवकरच प्रमुख नेत्यांची बैठक होईल. बैठकीत या प्रवेशबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, जेणेकरून भविष्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युतीत कोणताही संघर्ष उफाळणार नाही.
धावत्या बसने घेतला पेट; 27 प्रवासी बचावले –
पुण्याहून बीडकडे जाताना घटना, बस जळून खाक –
आज शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुण्याहून बीडकडे जाणाऱ्या कन्हैया ट्रॅव्हल कंपनीच्या एमएच ०९ सीव्ही ६३०९ आरामबसला अहिल्यानगर शहराजवळील बाह्यवळण रस्त्यावर अचानक आग लागली. बसमध्ये २७ प्रवासी गाढ झोपेत होते. चालकाने प्रसंगावधाना साधून त्याने तातडीने प्रवाशांना खाली उतरवले. यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. काही क्षणांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग वातानुकूलन यंत्रणेतील शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नगर तालुका पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
पुणे ते मुंबई विमान तिकीट 61 हजार रुपयांपर्यंत-
इंडिगो संकटात, शेकडो फ्लाईट्स रद्द-
देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोच्या बुधवार ते शुक्रवारदरम्यान 1 हजारहून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्यामुळे देशभरातील विमानतळांवर प्रचंड गोंधळ उडाला आहे. इंडिगोचा विमान वाहतुकीतील हिस्सा 65 टक्के आहे. या गोंधळाचे मुख्य कारण फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमांची अंमलबजावणी आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने पायलट आणि क्रू मेंबर्स विश्रांतीसाठी गेले. सॉफ्टवेअर ग्लिच आणि हिवाळ्यातील वेळापत्रकात झालेला बदल यामुळे परिस्थिती अधिक बिघडली. प्रवाशांचा वाढता संताप आणि गैरसोय पाहून अखेर डीजीसीएने 1 नोव्हेंबरपासून लागू केलेले FDTL मधील साप्ताहिक सुट्टीचे नियम तात्पुरते मागे घेतले आहेत. इंडिगोच्या या ऑपरेशनल समस्येचा फायदा घेत इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली. यामुळे पुणे ते मुंबई या अत्यंत कमी अंतरासाठीचे तिकीट चक्क 61 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे, जे लंडन किंवा थायलंडच्या आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांपेक्षाही महाग आहे. इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली असून, पुढील 48 तासात परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आश्वासन दिले आहे.
रशियन नागरिकांना भारतात येण्यासाठी फ्री व्हिसा –
भारत-रशियात अनेक महत्वाचे करार –
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात आज दिल्लीत झालेल्या 23 व्या शिखर परिषदेनंतर अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना भारत-रशिया संबंधांना बळकट करण्याची आणि 2030 पर्यंत आर्थिक सहकार्याचा नवा टप्पा गाठण्याची ग्वाही दिली. यावेळी मोदींनी भारत आणि रशियामधील मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी अढळ असल्याचे वर्णन केले. पुतिन यांचे आज सकाळी राष्ट्रपती भवनात २१ तोफांच्या सलामीने स्वागत करून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. मोदी यांनी रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचा मोफत ई-टुरिस्ट व्हिसा जाहीर केलाय. पुतिन यांनी भारताला इंधन आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा अखंड सुरू ठेवण्याचे आश्वासन दिलेय. तसेच दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्ध भागीदारी मजबूत करण्यावर भर दिलाय.
पाकिस्तानमध्ये तिन्ही सेनांचे प्रमुख बनले आसिम मुनीर –
वायुसेना प्रमुखांनाही 2 वर्षांची मुदतवाढ मिळाली –
पाकिस्तान सरकारने गुरुवारी आसिम मुनीर यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (CDF) आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) म्हणून नियुक्ती केली. दोन्ही पदांवर त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. या नियुक्तीला राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी मंजुरी दिली. मुनीर हे पाकिस्तानचे पहिले लष्करी अधिकारी आहेत जे एकाच वेळी CDF आणि COAS ही दोन्ही पदे सांभाळतील. याव्यतिरिक्त, एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू यांच्यासाठी दोन वर्षांच्या मुदतवाढीलाही मंजुरी देण्यात आली, जी मार्च २०२६ मध्ये त्यांचा सध्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर लागू होईल. पाकिस्तानी संसदेने १२ नोव्हेंबर रोजी लष्कराची ताकद वाढवणारी २७ वी घटनादुरुस्ती मंजूर केली होती. या अंतर्गत मुनीर यांना CDF बनवण्यात आले. हे पद मिळाल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या अणुबॉम्बची कमानही मिळाली, म्हणजेच ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत.
कर्ज स्वस्त होणार, RBI ने व्याजदर केला कमी –
शेअर बाजारामध्ये जोरदार तेजी –
आगामी काळात कर्ज स्वस्त होतील. सध्याचे EMI देखील कमी होतील. RBI ने रेपो दर 0.25% ने कमी करून 5.25% केला आहे. हा कपातीचा निर्णय मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या बैठकीत घेण्यात आला. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी ही माहिती दिली. RBI ज्या दराने बँकांना कर्ज देते, त्याला रेपो दर म्हणतात. जेव्हा RBI रेपो दर कमी करते, तेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते आणि ते हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजेच, आगामी काळात गृह आणि वाहन यांसारखी कर्जे 0.25% पर्यंत स्वस्त होतील. RBI द्वारे रेपो दरात कपातीच्या निर्णयामुळे आज शेअर बाजारामध्ये जोरदार तेजी दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांक दमदार वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स ४४७ अंकांनी वाढून ८५,७१२ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी १५२ अंकांनी वाढून २६,१८६च्या पातळीवर बंद झाला. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे ९५,००० कोटी रुपयांची वाढ झाली.
धुवांधार ‘धुरंधर’, डायलॉग्स वाह रे वाह –
शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा –
रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. धुरंधरच्या या कथेत, भारतीय एजंट्स पाकिस्तानमधील अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी हल्ल्यांना कसे हाणून पाडतात, हे दाखवले आहे. दिग्दर्शक-लेखक आदित्य धर यांनी इंटेलिजेंट आणि परस्पर जोडलेले अनेक ट्रॅक्स कुशलतेने हाताळले आहेत. रणवीर सिंह घातक लूकमध्ये क्रूर दिसतो, तर अक्षय खन्नाचीही दमदार भूमिक आहे. इतर कलाकारांनीही उत्कृष्ट काम केले आहे. चित्रपटातील अॅक्शन, देशभक्ती आणि दमदार डायलॉगबाजी सिनेमाला सिनेमॅटिक बनवतात. सचदेवचे म्युझिक आणि पार्श्वसंगीत प्रभावी आहे. ‘धुरंधर’ भाग २ लवकरच येणार असल्याचे संकेत शेवटी दिले आहेत.
मार्नस लाबुशेनने रचला इतिहास –
डे-नाइट टेस्टमध्ये १००० धावांचा टप्पा पार –
अॅशेस मालिकेतील दुसऱ्या डे-नाइट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो डे-नाइट कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने ही कामगिरी केवळ १६ डावांत पूर्ण केली, ज्यात चार शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची डे-नाइट कसोटीतील सरासरी ६६ हून अधिक आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने ६७ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव ३३४ धावांवर संपला होता. सध्या ऑस्ट्रेलिया डाव सुरु असून दुसऱ्या दिवसाखेर त्यांनी ६ बाद ३७८ धावा करत ४४ धावांची आघाडी घेतली आहे.




