नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त संसदेत आयोजित कार्यक्रमात घराणेशाहीवर हल्ला चढवला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी मोठं संकट असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ज्या राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीचं तत्व नाही, ते लोकशाहीचं संरक्षण कसं करू शकतील? असा सवालही मोदींनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे काँग्रेस, आप, शिवसेनेसह एकूण १४ विरोधीपक्षांकडून मोदी सरकारने आयोजित केलेल्या संविधान दिनावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे जात आहे जो संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोकं राजकारणात येत असतील तर ती घराणेशाही नसते, असेही ते म्हणाले.
Addressing the programme to mark Constitution Day in Central Hall. https://t.co/xmMbNn6zPV
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2021
नरेंद्र मोदी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर संविधान दिवस साजरा करायला हवा होता. जेणेकरून पुढील पिढ्यांना संविधान कसं निर्माण झालं हे कळलं असतं. मात्र, हा संविधान दिन खूप उशिरा साजरा झाला. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव व्हावं हे ऐकण्यास देश तयार नाही. आजही बाबासाहेबांच्या कामाचं पुण्यस्मरण करण्याची इच्छा न होणं ही काळजीची बाब आहे.”
“जे पक्ष लोकशाही तत्व हरवले ते लोकशाहीचं संरक्षण कसं करू शकतील? जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भारत एका संकटातून जात असल्याचं दिसतं. ते संकट म्हणजे घराणेशाही असलेले पक्ष,” असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.