प्रभात वृत्तसेवा पुणे ( गणेश आंग्रे ) – नोंदणी व मुद्रांक विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार आता तुकडेबंदीचा दस्त नोंदविताना आता खरेदीदार आणि विक्री करणारे यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नोंदणीसाठी सादर होत असलेले क्षेत्र त्यांनी यापूर्वी कोणत्याही अन्य व्यक्तीस नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरित केलेले नाही, तसेच दस्तनोंदणीसाठी सादर केलेला सातबारा उतारा व अन्य कागदपत्रे ही खरी आहेत, असा आशय प्रतिज्ञापत्रात नमूद करावा लागणार आहे. राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायत यांच्या हद्दीमध्ये तुकडेबंदी कायदा लागू असणार नाही, याची अधिसूचना शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धतीसुद्धा निश्चित करण्यात आली आहे. आता नोंदणी विभागाने परिपत्रक काढत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट घातली आहे. प्रतिज्ञापत्रातील कोणतेही कथन किंवा सोबत दिलेली कागदपत्रे खोटी, बनावट किंवा फेरबदल केलेली आढळल्यास, सर्व पक्षकार नोंदणी अधिनियम, 1908 च्या कलम ८२ नुसार गैरकृत्य केल्याबद्दल शिक्षेस पात्र असतील, याची त्यांना पूर्ण जाणीव असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. हा बदल जमिनीच्या नोंदी आणि हस्तांतरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. असे असेल प्रतिज्ञापत्र १)हस्तांतरित होत असलेली जमीन मिळकत दि. 15 नोव्हेंबर 1965 रोजी किंवा त्यानंतर आणि 15 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी निर्माण झालेल्या क्षेत्रांपैकी आहे, तसेच सदर हस्तांतरण किंवा विभाजन या अधिनियमाच्या कलम १ चे पोटकलम ४ मधील तरतुदीनुसार नियमाधीन मानले गेले आहे. २)नोंदणीसाठी सादर होत असलेले क्षेत्र त्यांनी यापूर्वी कोणत्याही अन्य व्यक्तीस नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरित केलेले नाही, तसेच हस्तांतरित होणारे क्षेत्र त्यांच्या एकूण धारण क्षेत्रापेक्षा जास्त नाही. ३)जमिनीचे हस्तांतरण नियमाधीन झाले असले, तरी त्याचा अर्थ असा नाही, की इतर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास तेही नियमाधीन झाले आहे. या भूखंडावरील बांधकाम नियमाधीन झाले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. दस्तामुळे भूखंडावरील बांधकाम नियमाधीन किंवा अधिकृत असल्याचा कोणताही दावा करण्यात येणार नाही. ४)सदर जमीन मिळकत शासकीय मालकीची नाही आणि तिच्या हस्तांतरणास कोणत्याही कायद्यानुसार कोणताही प्रतिबंध नाही, अशी खातरजमा करण्यात आली आहे. ५)प्रतिज्ञापत्रासोबत जोडलेले झोन दाखला, ७/१२ उतारा, मिळकत पत्रिका आणि अनुषंगिक कागदपत्रे वैध असल्याची हमी देण्यात आली आहे.