नवी दिल्ली/ थिम्फू – भूतानच्या हद्दीमध्ये चीनने एक गाव उभे केले असल्याचे वृत्त भारतातील भूतानच्या राजदूतांनी स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. चीनमधील “सीजीटीएन’ या सरकारी वृत्तसंस्थेच्या वरिष्ठ पत्रकार शेन सिवेई यांनी ट्विटरवर छायाचित्रासह या संदर्भातील पोस्ट केली होती.
मात्र भूतानचे भारतातील राजदूत मेजर जनरल वेटसोप नामग्यायी यांनी स्पष्ट शब्दात हे वृत्त फेटाळून लावले आहे. “भूतानमध्ये चीनचे कोणतेही गाव नाही.’ असे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
“नव्याने वसवण्यात आलेल्या पांगडा गावामध्ये कायम रहिवासीही आहेत. यांगडोंग प्रांताच्या दक्षिणेला 35 किलोमीटर अंतरावरच्या खोऱ्याजवळ हे गाव आहे.
हे गाव भूतानच्या हद्दीतच 2 किलोमीटरवर आहे.’ असे शेन सिवेई यांनी उपग्रहाच्या छायाचित्रासह आणि गावातील काही घरांच्या छायाचित्रांसह केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र अल्पावधीतच हे ट्विट हटवण्यात आले होते.