मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फुटला असून राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वच राजकीय पक्ष भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाच्या निवडणूक प्रचारसभेत प्रतिस्पर्धी काँग्रेसदेखील चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. अशातच भिवंडीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.भिवंडी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तिथेच वादाची ठिगणी पडली. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. लाठ्या-काठ्या, हाणामारी झाली, एकमेकांच्या दिशेने खुर्च्या फेकल्या गेल्या. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून नारपोली व भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.