कोरेगाव – लॉकडाऊनध्ये शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला स्वस्त धान्य दुकानांमधून पाच किलो धान्य मिळत आहे. मात्र, भिवडी, ता. कोरेगाव येथील बऱ्याच कुटुंबांना हे धान्य मिळत नसल्याची तक्रार भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे यांनी केल्यानंतर तहसीलदार रोहिणी शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
उबाळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमध्ये गरजू कुटुंबांना पाच किलो मोफत धान्य शासनाकडून देण्यात येत आहे; परंतु भिवडी येथील बऱ्याच कुटुंबांना संबंधित दुकानदार हे धान्य देत नसल्याचे तेथील ग्रामस्थांनी मला व्हॉटस्ऍपवर कळविले. मी पुणे येथे मुक्कामी असून लॉकडाऊन मला कोरेगावला येणे शक्य नाही. शासनाने दिलेले मोफत धान्य लोकांपर्यत पोहोचत नसेल तर त्यांनी कसे जगायचे? ही पैसे कमवायची वेळ नाही. त्यामुळे शासनाने दिलेले धान्य संबधित दुकानदाराने गरजू लोकांपर्यॅंत पोहोचवले पाहिजे.
दरम्यान, ग्रामस्थांच्या विनंतीवरून उबाळे यांनी तहसीलदार रोहिणी शिंदे व नायब तहसीलदार बेंद्रे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर बेंद्रे यांनी तहसील कार्यालयाच्या ईमेल आयडीवर निवेदन पाठविण्यास सांगितले. त्यानुसार उबाळे यांनी भिवडी ग्रामस्थांचे म्हणणे रोहिणी शिंदे यांना ईमेलद्वारे कळविले. त्यानंतर शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले.