प्रभात वृत्तसेवा मंचर – श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व दर्शन बारीतील पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी मंदिर शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानने घेतला आहे. या निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली असून भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्य शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू होत असून प्रत्यक्ष बांधकामाच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर तात्पुरते बंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात मंगळवार, दि.२३ रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार तसेच भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने मंदिर ९ जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रीचा कालावधी १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. सन २०२७ मध्ये नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. त्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५ च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश–निर्गमन व्यवस्था व गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्य पूजा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार नियमित सुरू राहणार आहेत. मात्र, या कालावधीत थेट दर्शन पूर्णपणे बंद राहील. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी–कर्मचारी व भीमाशंकर ग्रामस्थ वगळता इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले की, “श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास दीर्घकालीन सुरक्षितता व भाविकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून भाविक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.” असे आवाहन करण्यात आले.