Bhavaninagar News – श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडलेले आहे. मात्र, हा मार्ग पूर्ण होईपर्यंत किमान भवानीनगर येथील नीरा डाव्या कालव्यालगतच्या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तरी डांबरीकरण करून बुजवावेत, अशी संतप्त मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालक करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनचालकांचे कंबरडे मोडले असून, प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. बारामती-इंदापूर हा मार्ग कायम वर्दळीचा असून, नीरा डाव्या कालव्याच्या उतारावर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्डे चुकवताना या ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात होत आहेत. अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही जटील बनली आहे. रस्त्याच्या कडेला केवळ मुरुमीकरण करण्यात आले आहे, तिथेही डांबरीकरण करण्याची गरज व्यक्त होत आहे. पालखी महामार्गाचे काम रखडल्याने सध्या असलेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र, गेल्या चार वर्षात एकदाही या खड्ड्यांमध्ये डांबर टाकून ते बुजवण्याचे सौजन्य सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवलेले नाही. बारामती-फलटण रस्त्याचे काम पूर्ण झाले असताना, बारामती-इंदापूर पट्टा मात्र अद्यापही प्रलंबित आहे. केंद्र सरकारने या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे आणि तोपर्यंत तात्पुरती डागडुजी करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. महामार्गाचे काम पूर्ण व्हायला अजून किती वर्षे लागतील? खड्डे बुजवण्यासाठी डांबराचा वापर का केला जात नाही? अपघातात जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. रस्ता पूर्ण होईपर्यंत किमान खड्डे तरी डांबरीकरणाने बुजवावेत, जेणेकरून अपघात टळतील आणि वाहनचालकांचा संघर्ष थांबेल, अशी अपेक्षा भवानीनगरमधील नागरिक व्यक्त करत आहेत.