पुणे – पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी अंमली पदार्थ विरोधी पथक 1 चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ परिसरातील लॉजवर चालणारा वेश्या व्यवसाय, शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात बेकायदा हुक्का पार्लर तसेच नागरिकांच्या तक्रारींची योग्य ती दखल न घेणे त्यांना भोवले असल्याचे बोलले जाते.
त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारती जनता पक्षाच्यावतीने आंदोलने करण्यात आली होती. दरम्यान विनायक गायकवाड यांची नियुक्ती झाल्याने भारती विद्यापीठ परिसरातील अंमली पदार्थ विक्रेते आणि बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तर बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांची अंमली पदार्थ विरोधी पथक 1 च्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
विनायक गायकवाड यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असताना धडाकेबाज कामगिरी केली आहे. यामुळे शहरतील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. त्यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती होताच, परिसरातील अवैध्य व्यवसायीकही आता घाबरले आहेत.
मनसेचे खळखट्याक आणि भाजपचा आक्रमक पवित्रा
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉज आणि कात्रज बाह्यवळ मार्गावर नवले ब्रीज दरम्यान चालणाऱ्या वेश्या व्यवसायाविरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. दरम्यान कारवाई होत नसल्याने नागरिकांनी मनसेचे सरचिटणीस तसेच माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे धाव घेतली होती. तसेच खासदार सुप्रिया सुळेंनीही स्थानिक महिलांची भेट घेऊन पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या होत्या. परंतू कार्यवाही झाली नाही. यानंतर मनसेच्यावतीने वसंत मोरे यांनी आंदोलन केले. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी विभुक्त भटके आघाडेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोविंदा गुंजाळकर यांनी भारती विद्यापीठ महाविद्यालय परिसरातील बेकायदा हुक्का, तंबाखुजन्य पदार्थ आणि ई -सिगरेट विक्रेत्यांच्या विरोधात थेट गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीचीही पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली. यातच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने तक्रार दाखल करुन घेण्याची विनंती केली होती. मात्र पोलिसांनी टाळा-टाळ केल्याने भाजपा युवा मोर्चाच्यावतीने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले होते.