मुंबई : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Inauguration and Naming Ceremony of a Chowk in Andheri Mumbai after Late Smt Shantidevi Champalalji Kothari . pic.twitter.com/yzWzwj4MX3
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 29, 2022
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”
चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे. pic.twitter.com/jfM1pQ4p0w
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 29, 2022
आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले.
भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.