केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांचा दावा
पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पारदर्शी पद्धतीने काम करीत असून कायदा-सुव्यवस्था उत्तम आहे, अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. एकही जातीय दंगल झालेली नाही, असा दावा केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे केला. यावेळी जागतिक मंदीच्या वातावरणातही देशाची अर्थव्यवस्था उत्तम असून सहा टक्क्यांपेक्षा अधिक विकासदर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रविशंकर प्रसाद हे रविवारी पुण्यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रसाद म्हणाले, “देशातील नागरिकांच्या भाजप सरकारवर विश्वास आहे. त्याच्या बळावर सरकार कामे करत आहे. पुणे शहरात स्मार्ट सेवा सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. विशेषत: आयटी क्षेत्र विस्तारीत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभक्ती, सुशासन या पातळ्यांवर आघाडी घेतली असून देशात महाराष्ट्राची कामगिरी चांगली आहे, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले. निवडणुकीतही कॉंग्रसेचे कॅम्पेन “टेक ऑफ’ होत नाही. राहुल गांधी तर परदेशात गेले होते, आता महाराष्ट्रात येत आहेत, असे सांगत त्यांनी खिल्ली उडवली. तसेच कलम 370वरून रविशंकर यांनी कॉंग्रेसवर टीका केली.