Sharad Pawar | बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत तब्बल २०२ जागा जिंकल्या आहेत. तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला. भाजप या निवडणुकीत मोठा पक्ष ठरला आहे. तर जेडीयू दुसरी सर्वात मोठी पार्टी ठरली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या निकालावर गंभीर भाष्य केले आहे. पैसे वाटून निवडणुका होत असतील तर त्याचा विचार झाला पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनीही या निवडणुकीआधी राबवल्या गेलेल्या योजनेवरुन सरकारला लक्ष्य केलं. ते म्हणाले की, “या निवडणुकीत काही वेगळा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. निवडणुकीपूर्वी १० हजार रुपये वाटप करणं हे एक प्रकारचं करप्शन आहे आणि ते सरकारने केलं आहे. महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले, म्हणजे प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्यावतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले, म्हणजे लाडकी बहीण योजना. निवडणूकीआधी अधिकृतपणे पैसे वाटणे चिंतेची बाब आहे.” “या निकालाबाबत दोन तीन गोष्टी आहेत. या निवडणुकीत जे मतदान झालं त्याच्याविषयी मी काही लोकांशी बोललो. त्यांनी सांगितलं की या निवडणुकीत मतदान महिलांनी हातात घेतलं होतं. मला एक शंका होती की बिहारच्या महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला याचा अर्थ आहे की दहा हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम आहे. महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाटले. मताला पैसे येतात तसे नाही. अधिकृतपणे पैसे वाटले गेले. तसंच यावेळी बिहारमध्ये झालेले आहे,” असे शरद पवार म्हणाले. पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? “आता प्रश्न असा आहे की यापुढील निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही ”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. Sharad Pawar | निवडणूक सिस्टिम करप्ट मार्गावर “काही दिवसात संसदेचं अधिवेशन सुरू होईल. तेव्हा विरोधकांची मिटिंग आम्ही बोलावू. त्यात आम्ही याबाबतचा विचार करू. ही गोष्ट सोपी नाहीये. सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते अधिकाराचा वापर पैसे वाटप करत आहे. निवडणूक सिस्टिम करप्ट मार्गावर नेत आहे. त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आम्ही यावर चर्चा करून काही तरी करू. पैसा वाटप केल्यानंतरही निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली,” असे शरद पवार म्हणाले. Sharad Pawar | हेही वाचा: अक्षय कुमारच्या ‘हैवान’ चित्रपटात साऊथ सुपरस्टारची एन्ट्री; चाहत्यांनी व्यक्त केला आनंद