नवी दिल्ली : करोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’मुळे संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘ओमिक्रॉन’चा उद्रेक झाल्याने जगातील काही देशांनी सतर्कतेचे पाऊल म्हणून निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या देशांमध्ये करोनाचा नवा विषाणू सापडला आहे, त्यांच्यावर काही देशांनी प्रवासासाठी निर्बंध लावले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. यादरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधक संस्थेने (ICMR)‘ओमिक्रॉन’बद्दल महत्वाची माहिती दिली आहे.
आयसीएमआरने सध्या घाबरण्याची कोणतीही गरज नसून काळजी घेण्यासोबतच लवकरात लवकर करोनाचा दुसरा डोस घ्यावा असे आवाहन केले आहे. ‘ओमिक्रॉन’मध्ये होत असलेले रचनात्मक बदल काळजी वाढवण्याची शक्यता कमी आहे. हा नवा विषाणू घातक किंवा अनेक आजार निर्माण करणारा ठरेल असे गरजेचे नाही. अशी कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नसून आपल्याला वाट पहावी लागेल,” असे आयसीएमआरचे डॉक्टर समीरन पांडा यांनी सांगितले आहे.
समीरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या नव्या विषाणूंमधील उत्परिवर्तने सूचक असलं तरी ते वेगाने फैलाव करेल असे लगेच म्हणता येणार नाही. मात्र सतर्क राहणं आणि पूर्वकाळजी घेणं महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले आहेत.
“घाबरण्याची कोणतीही गरज नाही. आपल्याला तात्काळ लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. दोन्ही लसीचे डोस घेतलेल्यांची संख्या वाढली तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे उत्तम असेल,” असे ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “करोनाचा नवा व्हेरियंट गंभीर असला तरी लागण होण्याची पद्धत सारखीच आहे, त्यामुळे लसीकरणासोबत मास्कचा वापर, गर्दी टाळणं, सॅनिटायजेशनचा वापर अशा गोष्टी त्याच्याविरोधात लढण्यासाठी महत्वाच्या आहेत”.