नागपूर – करोना महामारीचा वेग कमी होताच आता गोवरचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबई मध्ये गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गोवर आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, ही साथ पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही गोवर करोनापेक्षा पाचपट वेगाने पसरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लहान मुलांमध्ये तो अधिक वेगाने पसरण्याची भीती तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे.
मात्र, असे असले तरी नागपुरात आता डेंग्यू आजाराने आपले डोके वर काढले असल्याचं पाहायला मिळत आहे. गोवर आजार पाटोपाठ डेंग्यूच्या आजाराचा धोका नागरिकांना भेडसावत आहे. शहरात जानेवारी ते नोव्हेंबर 2022 पर्यंत डेंग्यूच्या 98 रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे एकट्या नोव्हेंबर महिन्यात 22 रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, पालिका आणि आरोग्य विभागाकडून देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी वाहते करणे, निरुपयोगी भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सध्या महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवर आजाराचा फैलाव होत आहे. आणि आता या आजराची गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई शहरात टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. ज्याप्रकारे करोना काळात टास्क फोर्सने वाढत्या करोना रुग्णसंख्येवर लक्ष दिलं होतं, मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्याचप्रकारे गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापन होणार आहे.