जयपुर -पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या अर्धशतकवीर जोस बटलरला मंकड्स पद्धतीने धावबाद केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककरील यष्ट्यांच्या बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले. यानंतर क्रिकेटच्या सर्व स्तरावरुन अश्विनवर प्रचंड टीका करण्यात आली.
या संदर्भात बीसीसीआयनेही आपली प्रतिक्रीया देताना सांगितले की, अशा प्रकारे एखाद्या फलंदाजाला बाद करणे हे खिलाडू वृत्तीच्या बाहेरचे आहे, अश्विनने बटलरला बाद करण्यापुर्वी एकदा समज द्यायला हवी होती. अश्विनने खिलाडू वृत्ती दाखवली नाही.
एखाद्या फलंदाजाला गोलंदाजाने आपल्या क्रिकेटमधील कौशल्याने बाद करावे ही खरी खिलाडूवृत्ती आहे. सामने पाहणारे प्रेक्षक आणि त्यातून शिकणारी पिढी हीच खिलाडूवृत्ती पाहण्यासाठी येतात. त्यामुळे अश्विनने खिलाडू वृत्तीचे भान राखणे गरजेचे होते. सामनाधिकारी आणि पंच यांची याबाबत निर्णय देण्यात चूक झाली. जर सामनाधिकाऱ्यांना बटलरला नाबाद ठरवता आले असते. याचबरोबर नियम आणि खिलाडीवृत्ती या दोनही गोष्टी लक्षात ठेवून अश्विनने खेळायला हवे होते, असेही ते म्हणाले.