बारामती : शहरातील वाहतूक आराखड्यास व्यापार्यांचा विरोध

जळोची(प्रतिनिधी) – बारामती शहरातील वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या वाहतूक आराखड्यास नुकतीच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मान्यता दिली आहे. मात्र या वाहतूक आराखड्यास शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून, सदर नव्या वाहतूक आराखड्यात बदल करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1258228177850218/
नगरपालिकेने तयार केलेल्या नव्या वाहतूक आराखड्यात मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. बाजारपेठेतील या एकेरी वाहतूक व्यवस्थेमुळे भविष्यात व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. या भीतीने नुकतीच बारामती व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची केली. यावर उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराती, उपाध्यक्ष सुभाष सोमाणी, शैलेश साळुंखे, महेश ओसवाल, स्वप्निल मुथा, प्रवीण आहुजा, निलेश कोठारी, सुनील शिंदे यांनी अजित पवारांकडे वाहतुकीत बदल करण्याची मागणी केली.
मंजूर नव्या वाहतूक आराखड्यात शहरातील अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतुकीसह वाहन पार्किंगच्या व रिक्षा थांबेच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच ठीक ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात आले असून अवजड वाहने बाह्यवळण रस्त्याने वळवली जाणार आहेत. ऑक्टोंबर २०१८ मध्ये बारामती नगरपालिकेने या आराखड्यास मान्यता दिली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या आराखड्यास मान्यता दिली. मात्र या वाहतूक आराखड्यास व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने सदर वाहतूक आराखड्यास पालिकेने स्थगिती दिली आहे.





