Deepak Jagtap Strawberry Success : बारामती तालुका म्हटलं की डोळ्यासमोर उसाची हिरवीगार शेती उभी राहते. पारंपरिक पिकांवर आधारित शेती हीच या भागाची ओळख मानली जाते. मात्र याच बारामतीतील निंबुत येथील पठारी, उष्ण आणि तुलनेने कोरड्या हवामानात स्ट्रॉबेरीसारखे थंड हवामानातील पीक घेऊन बारामतीतील प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांनी शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ प्रयोग म्हणून सुरू केलेली ही लागवड आज आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असून आधुनिक, विज्ञानाधारित शेतीचा मार्ग दाखवणारी ठरली आहे. दीपक जगताप यांना अंजीर शेतीचा तब्बल १७-१८ वर्षांचा अनुभव आहे. जवळपास सात एकर क्षेत्रावर त्यांची अंजीर बाग आहे. त्याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा निर्णय घेतला. अनुभवी असलेल्या अनेकांनी बारामतीच्या हवामानात स्ट्रॉबेरी शक्य नसल्याचे सांगितले, पण त्यांनी पिकाचे सूक्ष्म निरीक्षण आणि व्यवस्थापनावर भर दिला आणि स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेतल. त्यांच्या मते, पिकाची ‘भाषा’ समजून घेणे हेच खरे तंत्रज्ञान आहे. पानांचा रंग, वाढ, हालचाली यावरून अन्नद्रव्यांची गरज ओळखणे, रोग येण्याआधी त्याची लक्षणे पकडणे आणि योग्य वेळी उपाययोजना करणे हा त्यांच्या यशाचा पाया ठरला. थ्रिप्स, माईट्स किंवा मूळकुज यांसारख्या समस्यांवर त्यांनी प्रतिबंधात्मक व्यवस्थापन केले. “पानं पाहिली की झाड काय सांगतं हे कळायला हवं. खत किंवा औषध कधी द्यायचं हे निसर्गच शिकवतो,” असे ते सांगतात. जगताप यांनी वाई परिसरातून ‘विंटर’ वाणाची १० हजार स्ट्रॉबेरी रोपे आणली. मात्र लागवड करताना त्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी परिस्थितीनुसार बदल केले. ऑक्टोबरच्या उष्णतेचा फटका बसू नये म्हणून त्यांनी लागवडीनंतर लगेच प्लॅस्टिक मल्चिंग न करता तीन आठवड्यांनी ते केले. त्याचबरोबर उसाच्या पाचटाचा वापर करून ‘स्ट्रॉ मल्चिंग’ केल्याने जमिनीचे तापमान नियंत्रणात राहिले, ओलावा टिकला आणि रोपांना नैसर्गिक गारवा मिळाला. या सूक्ष्म हवामान व्यवस्थापनामुळे प्रतिकूल परिस्थितीतही पीक जोमाने वाढले. या प्रयोगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अर्थकारण. पारंपरिक उसासाठी एक एकर क्षेत्र आणि सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यातून साधारण १.५ ते २ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. याउलट जगताप यांनी अवघ्या १० गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली. सुरुवातीला त्यांनी लेंडी खत आणि गांडूळ खताचा वापर केला. शेतामध्ये बेड तयार केले आणि त्यावर स्ट्रॉबेरीचा रोपांची लागवड केली. दोन महिन्यानंतर उत्पादन सुरू झाले सुरुवातीला उत्पादन कमी होते. अगदी एका वेळेस 10 ते 20 किलो उत्पादन मिळत होते सुरुवातीला तोटा होतो की काय? असं वाटत होतं. मात्र पुढे चांगलं उत्पन्न मिळाले भावही चांगला मिळाला. फक्त ५-६ महिन्यांत सुमारे ९ ते ९.५ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता त्यांना ४.५ ते ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. या पिकासाठी त्यांना आत्तापर्यंत 4 लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. अजूनही पुढील दोन महिने या एकाचे उत्पन्न मिळणार आहे.त्यामुळे आणखी साडेचार ते पाच लाखाचे उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कमी क्षेत्र, कमी कालावधी आणि जास्त उत्पादन या सूत्रामुळे हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे. उत्पादनाबरोबरच मार्केटिंगवर त्यांनी विशेष लक्ष दिले. स्थानिक बाजारावर अवलंबून न राहता कोल्हापूर, बेळगाव आणि बेंगळुरू बाजारपेठांमध्ये थेट माल पाठवला. लवकर लागवड केल्यामुळे सुरुवातीला प्रति किलो सुमारे ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. नंतर दर कमी झाला तरी सातत्यपूर्ण उत्पादनामुळे उत्पन्न स्थिर राहिले. १० गुंठ्यांसाठी जवळपास ९० हजार रुपयांची रोपे घेणे हे धाडस होते, पण त्यामागे अभ्यास आणि नियोजन होते. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिल्यासच ती फायदेशीर ठरते, असा त्यांचा विश्वास आहे. “शेतीमध्ये कष्ट तर आहेतच, पण विज्ञान आणि नियोजनाची जोड दिली तर शेती खूप काही देऊ शकते. तरुणांनी प्रयोग करायला घाबरू नये,” असा संदेश ते देतात. दीपक जगताप यांचा स्ट्रॉबेरी प्रयोग हे दाखवून देतो की शेतीमध्ये हवामान किंवा परंपरा हे अंतिम बंधन नाही. योग्य पीक निवड, सूक्ष्म व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचे ज्ञान असेल तर कमी क्षेत्रातूनही मोठे उत्पन्न मिळू शकते. बारामतीच्या निंबुत येथील पठारावर उमललेली ही स्ट्रॉबेरी केवळ गोड फळ नाही, तर बदलत्या भारतीय शेतीचे प्रतीक ठरत आहे. जिथे मेहनतीसोबत विज्ञान आणि धाडस यांची जोड यशाचा नवा मार्ग तयार करत आहे.