गाळप, साखर उत्पादनातील आजअखेरची आकडेवारी : साखर उतारा वाढू लागला
भवानीनगर – जिल्ह्यात साखर कारखान्यांतील धुराड्यांनी गती पकडली आहे. त्यामुळे सहकारी आणि खासगी कारखान्यांत ऊस गाळपावरून तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे आजअखेर गाळप झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. दि. 21 अखेर गाळप झालेल्या सहकारी आणि खासगी कारखान्यांमध्ये शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती ऍग्रो लिमिटेड कारखान्याने बाजी मारत प्रथम स्थान पटकाविले आहे. बारामती ऍग्रोने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात कमालीची आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ दौंड शुगर कारखाना सरस ठरला आहे. यावेळी सहकारातील कारखाने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर गेले आहेत.
पुणे जिल्ह्यात यंदा 14 सहकारी आणि सहकारी साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले आहे. यात गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखाना अग्रक्रमावर होता. त्यावेळी विघ्नहर कारखान्यापाठोपाठ खासगी कारखाने दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते. मात्र, गेल्या तीन आठवड्यात खासगी कारखान्यांनी बाजी मारत सहकारी कारखान्यांना मागे टाकले आहे. यावेळी बारामती ऍग्रो कारखान्याने आजअखेर 2 लाख 10 हजार 655 टन ऊस गाळप केले आहे. साखर उत्पादनात 1 लाख 88 हजार 50 पोत्यांचे उत्पादन झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर दौंड शुगर कारखाना आहे. या कारखान्याने 1 लाख 97 हजार 340 टन गाळप केले आहे. या कारखान्याने 1 लाख 73 हजार 340 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.
तिसऱ्या क्रमांकावर श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने 1 लाख 78 हजार 610 टन ऊस गाळप केले आहे. तसेच 1 लाख 77 हजार 500 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. माळेगाव कारखान्याने 1 लाख 65 हजार 615 टन ऊस गाळप केले आहे. त्याचबरोबर 1 लाख 44 हजार 800 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर श्री सोमेश्वर कारखाना आहे. या कारखान्याने 1 लाख 59 हजार 485 टन ऊस गाळप केले आहे. तसेच याच कारखान्याने 1 लाख 67 हजार 750 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
इतर कारखान्यांची लाखांवर झेप
जिल्ह्यातील वरील पाच कारखान्यांव्यतिरिक्त इतर कारखान्यांनी एक लाखांवर ऊस गाळप आणि साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे टॉप फाईव्हमध्ये इतर कारखान्यांशी स्पर्धा करताना नाकीनऊ येणार आहे. एक लाखांवर टप्पा पार केलेल्या कारखान्यांमध्ये भीमाशंकर, घोडगंगा, श्री संत तुकाराम कारखाना, अनुराज शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी एक लाखांवर ऊस गाळप आणि साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
साखर उतारा साडेदहांवर पोहोचला
जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखान्यांकडून साखर उताऱ्यातील घट चिंतेची बाब होती. थंडीचे प्रमाण घटल्यामुळे साखर उताऱ्यात घट झाली होती. महिनाभर याचा सामना कारखान्यांना करावा लागला होता. आता थंडी वाढू लागल्यानंतर साखर उताऱ्यात वाढ झाली आहे. भीमाशंकर सहकारी कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्यांचा साखर उतारा 10.54 टक्के आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्री सोमेश्वर कारखाना आहे.
या कारखान्याचा साखर उतारा 10.52 टक्के आहे. घोडगंगा कारखान्याचा साखर उतारा 10.49 टक्के आहे. तर विघ्नहर कारखान्याचा साखर उतारा 10. 35 टक्के इतका आहे. या चार कारखान्याव्यतिरिक्त इतर कारखान्यांना साखर उतारा 9 ते 10 टक्क्यांच्या आसपास घुटमळला आहे. इंदापूर तालुक्यातील कारखान्यांची कामगिरी ऊस गाळप आणि साखर उत्पादनात सुमार कामगिरी आहे. हे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.