प्रभात वृत्तसेवा पुणे – ‘पितृसत्ताक समाजव्यवस्थेत महिलांना कोणतीच किंमत दिली जात नाही, तिच्या कष्टाची कदर केली जात नाही. महिलेने कायम गप्प राहावे, असे या व्यवस्थेला वाटते कारण, तिने प्रश्न विचारायला सुरुवात केल्यास पितृसत्ताक व्यवस्थेचा पाया डळमळीत होईल,’ असे परखड मत ‘बुकर’ सन्मान प्राप्त लेखिका बानू मुश्ताक यांनी व्यक्त केले. देशात सध्या भावनिक मुद्देच चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. रोजगार, शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींवर चर्चा होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुणे पुस्तक महोत्सवात ‘पुणे लिट फेस्ट’मध्ये ‘व्हॉईसेस बिहाइंड द हॉर्ट लॅम्प : स्टोरीज ऑफ मुस्लिम वुमन, रेझिलियन्स अँड रेझिस्टन्स’ या सत्रात बानू मुश्ताक बोलत होत्या. युवा लेखक वेदांत अगरवाल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. दक्षिण भारतीय मुस्लिम महिलांच्या पितृसत्ताक समाजाशी संघर्षाच्या लघुकथा मांडणाऱ्या ‘हॉर्ट लॅम्प’ या पुस्तकासाठी बानू मुश्ताक यांना ‘बुकर’ या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा प्रेरणादायी साहित्य प्रवास त्यांनी उलगडला. हिजाब घालणे हा सांस्कृतिक रिवाज आहे, त्याला धर्मग्रंथाची मान्यता नाही. चेहरा ही सर्वांची ओळख आहे. तरीही महिलेला गप्प बसविण्यासाठी हिजाब घालण्याची सक्ती केली जाते, अन्यथा तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, असे सांगत त्यांनी हिजाब सक्तीचा परखड विरोध केला. भारतीय महिलांमध्ये भगिनीभाव असतो. पुरुषही महिलांच्या हक्कांसाठी झगडतात. त्यामुळे भारतीय समाज अतिशय चांगला आहे. परंतु, धर्मनिरपेक्ष देशात राहताना आपल्या खासगी श्रद्धेने लोकशाहीला बाधा पोहोचणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे,’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.