कोलकाता -केवळ ऍप्सवरील बंदी पुरेशी नाही. चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, अशी भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मांडली. चीनी कुरापतींमुळे सध्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्यापार्श्वभूमीवर, मोदी सरकारने सोमवारी चीनशी संबंधित 59 मोबाइल ऍप्सवर बंदी घातली.
चीनला दणका देणारे पाऊल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. मात्र, ऍप्सवरील बंदी हे चीनला योग्य प्रत्युत्तर ठरणार नाही, असे परखड मत ममतांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अर्थात, चीनला कसे प्रत्युत्तर द्यायचे त्याविषयीचा निर्णय मी मोदी सरकारवर सोडते. त्या सरकारच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल.
मात्र, एकीकडे आक्रमक पवित्रा स्वीकारतानाच दुसरीकडे आपण राजनैतिक मार्गांचाही वापर करायला हवा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्याची घोषणा केली. त्यावरही ममतांनी प्रतिक्रिया दिली. देशातील सर्व 130 कोटी जनतेसाठी ती योजना असायला हवी, असे त्या म्हणाल्या. ममता यांच्या सरकारने बंगालमधील लाभार्थींना पुढील वर्षीच्या जूनपर्यंत मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.