Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंसाचार आणि सध्याच्या परिस्थितीमागे पाकिस्तानचा हात – सजीब वाझेद जॉय

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये गुरुवारी अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. बांगलादेशातील विरोधानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्या सध्या भारतात राहत आहेत. अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाझेद जॉय यांनी मोठा दावा केला आहे. बांगलादेशातील हिंसाचार आणि सध्याच्या परिस्थितीसाठी जॉय यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, असे अनेक पुरावे आहेत ज्यामुळे पाकिस्तानची आयएसआय एजन्सी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
शस्त्रेही पुरवली….
सजीब वाजेद जॉय म्हणाले की, हल्ले आणि निदर्शने घडवण्याचे काम पाकिस्तानच्या आयएसआय (ISI) एजन्सीकडून अतिशय सुनियोजित नियोजनाने केले गेले. हिंसाचार भडकावण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर करण्यात आला. हिंसाचार वाढवण्यासाठी परकीय शक्तींकडून शस्त्रे पुरवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
पुनरागमन करणार शेख हसीना…
सजीद वाजेद जॉय पुढे म्हणाले की, लोकशाही पुनर्स्थापित होताच शेख हसीना बांगलादेशात परत येऊ शकतात. तथापि, 76 वर्षीय शेख हसीना “निवृत्त किंवा सक्रिय” नेत्या म्हणून परत येतील की नाही हे निश्चित नाही. या संकटाच्या वेळी आपण आपल्या लोकांना सोडणार नाही आणि अवामी लीगलाही सोडणार नाही, असेही शेख हसीना यांच्या मुलाने म्हटले आहे. देशभरातील नेते आणि कार्यकर्त्यांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत जॉय यांनी चिंता व्यक्त केली आहे.
आपल्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवामी लीग हा बांगलादेशातील सर्वात मोठा आणि जुना राजकीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही आमच्या लोकांपासून दूर जाऊ शकत नाही.
Bangladesh Crisis : सरकार पडल्यानंतरही हिंसाचार थांबेना, आतापर्यंत 232 जणांचा मृत्यू…
पंतप्रधान मोदींचे मानले आभार
जॉय यांनी आपल्या आईच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत. तसेच अवामी लीगला ‘भारताचा सहयोगी’ असे संबोधले आहे. अवामी लीगच्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी भारताने आंतरराष्ट्रीय दबाव टाकावा, असे आवाहन केले आहे. जॉय यांनी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशातील ‘इंडिया आऊट’ मोहिमेबाबत बोलताना जॉय म्हणाले की, भारतविरोधी शक्ती खूप सक्रिय आहेत.





