नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का देत तृणमूल काँग्रेस पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात आघाडी घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र नंदीग्राम मतदार संघातून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पिछाडीवर होत्या. या प्रतिष्ठेच्या लढाईत ममता यांनी बाजी मारली आहे.
राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांनी चुरशीच्या लढतीत भाजपच्या सुवेंदू अधिकारांचा निसटता पराभव केला. ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांना 1200 मतांनी हरवले.
सुरुवातीच्या कलांनुसार नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी पिछाडीवर पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात सातत्याने काँटे की टक्कर सुरु होती. सध्या तृणमूल काँग्रेस 212 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या 78 जागांवर आघाडीवर आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यानंतर ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यातील लढत सर्वाधिक चर्चेत आली होती. सुवेंदू अधिकारींनी काही दिवसांआधीच तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. ममता बॅनर्जींसोबत नंदीग्राम आंदोलनात मुख्य भूमिका घेणारे सुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जींच्याविरोधात निवडणुकीत उतरले होते. मागील निवडणुकीत सुवेंदू हे ८१ हजारांच्या मताधिक्याने जिंकले होते. यावेळी मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. नंदीग्रामवर तृणमूलचा 2009पासून ताबा आहे.