अभिनेता मनोज बाजपेयी यांचा आगामी चित्रपट ‘सिर्फ एक बंदा काफी है’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा चित्रपट खऱ्या घटनांनी प्रेरित असल्याचा दावा केला जात आहे.
तर दुसरीकडे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला कोर्टरूम ड्रामा पाहता हा चित्रपट आसाराम बापूंवर आधारित असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत कुठेही सांगितलेले नाही. पण, मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आसाराम बापू ट्रस्टने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.
खरे तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आसाराम बापूंचे नाव कुठेही वापरलेले नाही. पण, मनोज बाजपेयीने साकारलेली व्यक्तिरेखा पाहता अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित या चित्रपटात आसाराम बापूंची कथा दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे. मनोज बाजपेयीने या चित्रपटात पीसी सोलंकी नावाच्या वकिलाची भूमिका साकारली आहे.
खऱ्या आयुष्यात याच नावाच्या एका वकिलाने आसाराम बापूंविरोधात खटला लढवला होता. कदाचित त्यामुळेच आसाराम बापू ट्रस्टने या चित्रपटावर कारवाई केली असावी. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात नोटीस जारी केली आहे. ‘सिर्फ एक बंदा काफी है’च्या ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. हा ट्रेलर पाहून लोक म्हणाले की,’हे आसाराम बापूचे प्रकरण आहे का? ‘ तर आसाराम बापूंच्या चॅरिटेबल ट्रस्टने चित्रपटाच्या प्रमोशन आणि रिलीजवर कोर्टाकडे स्थगिती मागितली आहे.