Balbharati: बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या पुस्तकांत चुकाच चुका
Balbharati:

मुद्रणदोषामुळेच चुका झाल्याचे बालभारतीचे स्पष्टीकरण
Balbharati: बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या गणिताच्या पुस्तकांमधील श्रीनिवास रामानुजन यांची मृत्यू तारीख आणि त्यासोबत गणिताच्या काही पर्यायांबाबत आणि भागाकार संकल्पना संदर्भामध्ये आकड्यांमध्ये चुका आढळून आलेल्या आहेत. मुद्रणदोषामुळेच या चुका झाल्याचे बालभारतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विविध संघटनांकडून बालभारतीच्या कारभारावर टीकास्त्र सुरू झाले आहे.
यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमांत बदल झाला आहे. मात्र, पुस्तकांमध्ये अनेक चुका असल्याचे उघडकीस येत आहे. यापूर्वीही इयत्ता तिसरीच्या आपल्या सभोवतालचे जग भाग- २ पाठ्यपुस्तकात चुका झाल्याची गंभीर बाब उघड झाली होती.
भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे निधन २६ एप्रिल १९२० रोजी झाले असताना बालभारतीच्या पुस्तकात २७ एप्रिल १९२० अशी चुकीची तारीख छापली आहे. लांबी, वजन मापन आणि भागाकार या मूलभूत प्रकरणांमधील आकड्यांमध्येही मोठ्या गडबडी आढळल्या आहेत.
मुद्रितशोधन करणाऱ्या व्यक्ती नियुक्त केलेल्या असताना पुस्तकात मुद्रणाच्या चुका होणे अपेक्षित नाही. त्याबाबत जबाबदारी अधोरेखित करून कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
पुढील आवृत्तीत चुकांची दुरुस्ती
इयत्ता चौथीची गणित विषयाची पाठ्यपुस्तके एकूण १० माध्यमांत छापली जात आहेत. त्यापैकी मराठी व इंग्रजी माध्यमातील काही चुका दर्शवलेल्या आहेत. या सर्व चुका मुद्रणदोषामुळे झाल्या आहेत. त्या पुढील आवृत्तीत दुरुस्त केल्या जाणार आहेत.
आता विद्यार्थी आणि शिक्षकांना योग्य माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित सुधारित बदलांचा व्हिडिओ पाठ्यपुस्तकातील क्युआर कोडद्वारे तातडीने अपलोड करण्यात येणार आहे, असे बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.





