मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपली रणनीती आखत आहेत. त्यातच आता कॉंग्रेसमध्ये मोठा बदल होत बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यपदाची धुरा स्वीकारल्यानंतर थोरात यांनी मनसेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
लोकशाही आणि पुरोगामी मुल्य टिकवण्यासाठी आताचं सरकार घालवायचं आहे. हे सरकार घालवण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तर सोबत आहोतच पण वंचित आघाडी आणि मनसेलाही आगामी निवडणुकीत सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मनसेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीत यशस्वी होणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचे सरकार येणार,’ असे म्हणत कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.