नाना पटोलेंनी केले गंभीर आरोप म्हणाले,’बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव, CCTV फुटेज गायब’

Nana Patole । बदलापूरमधून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. बदलापूरमधील एका शाळेत लहान मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचे समोर आले. या घटनेचे पडसाद बदलापूरमध्ये उमटले असून रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक तासांपासून रेल्वे रोको सुरू आहे. आरोपीला इथेच फाशी द्या अशी मागणी करत आंदोलकानी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात अक्षय शिंदे या आरोपीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सुद्धा महायुतीवर सरकारवर टीका केली आहे.
अशात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप लगावले आहे. बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे.
नाना पटोले माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र हा गुजरात धार्जिणा करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहे. बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे. शाळेतले सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले. मुख्यमंत्री बदलापूरला जाऊन त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद
येत्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देत आहे. तरी जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.





