प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेला शब्द किंवा आश्वासन मुदतीत पाळले नाही, तर १ जुलैपासून महाराष्ट्रातील एकही रेल्वे लोहमार्गावर धावू देणार नाही, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्य सरकार ३० जूनपर्यंत निर्णय घेणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना बँकांकडून तगादा लावला जात आहे, नवीन कृषी कर्जाबाबत अडवणुकीचे प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बच्चू कडू, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राज्यभर काढण्यात येणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा प्रारंभ पुण्यातून झाला. यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी कडू यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. या वेळी शेतकरी नेते अजित नवले, वामनराव चपट, किसान सभेचे अनेक नेते आणि शेतकरी संघटनांचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.कडू म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांचे ३० जूनपर्यंत सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सरकारने आश्वासन म्हणजे केवळ शब्दच दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आंदोलनामध्ये काही अडचणी आल्या. निसर्गाकडूनही थोडी साथ मिळाली नाही म्हणून तात्पुरती माघार घेतली. मात्र, आता माघार घेणार नाही. सरकारमधील काही नेते खानदानी राजकारणी असल्याचे दाखवून यामध्ये राजकारण करतील. मात्र, मी खानदानी आंदोलक आहे. कमी कार्यकर्ते असले, तरी राज्यभरातील सर्व रेल्वे कशा रोखायच्या, याचा पूर्णपणे बारकाईने अभ्यास केला आहे.