प्रभात वृत्तसेवा पुणे – निर्णय होऊन चार वर्षे झाली तरी सरकार शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइनच्या काळ्या बाजारातून बाहेर काढत नाही. प्रामाणिक शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करायचे की बदल्यांसाठी मंत्रालयाच्या दलालांच्या दारात हेलपाटे मारायचे? हा प्रकार थांबवला गेला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा तीव्र इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. यासंदर्भात कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक आणि १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. शासनाने १६ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑनलाईन बदल्यांसाठी निर्णय जारी केला, मात्र २०२५ उजाडले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि राजकीय दबावाखाली अपात्र व्यक्तींना सोयीच्या जागा मिळतात. त्यात प्रामाणिक शिक्षकांकडे दुर्लक्ष होते. हा त्यांच्या आत्मसन्मानावरील घाला आहे. शिक्षक बदलीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारावे. ही प्रक्रिया संगणकीकृत व पारदर्शक असावी. शासनाने तात्काळ ऑनलाईन पोर्टल सुरू करावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही कडू यांनी दिला.