छत्रपती संभाजीनगर – रामनवमीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा येथे दोन गटांत राडा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी झालेल्या दंगलीमध्ये पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. यात काही पोलीस जखमी झाले. यावरून आता राजकीय नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नुकतेच चंद्रकांत खैरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत एमआयएम भाजपची बी टीम असल्याचे विधान केले होते. यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, “आपले दोष लपवण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा या घटनेचा तपास करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी नेमा आणि या घटनेची सखोल चौकशी करा. वाईट घडले की, आमच्याकडे बोट दाखवले जाते आणि चांगले झाले की ते त्यांच्यामुळे घडले असे सांगतात. हे सर्व लोक सॉफ्ट टार्गेट शोधत आहेत.”
चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. तसेच “मी सध्या कोणत्याही नेत्याच्या आरोपावर उत्तर देणार नाही. सरकारने चौकशी समिती नेमावी, त्यातून सत्य बाहेर येईल,” असे स्पष्ट इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे. इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?
चंद्रकांत खैरे म्हणाले की, “मी मंत्री असताना पाच वर्षात एकही दंगल झाली नाही. पण, सध्याच्या गृहमंत्र्यांचे लक्ष नाही. 2 एप्रिलला महाविकास आघाडीचा मेळावा आहे. त्यात विघ्न आणण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. एमआयएमला उचकवून देण्याचे काम करण्यात येत आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, असे सर्व लोक म्हणत आहेत. याचे मास्टमारईंड देवेंद्र फडणवीस आहेत.”