मेलबर्न – भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न (एमसीजी) क्रिकेट मैदानावर होणार आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मैदानावर होणारी ही लढत भारतीय संघासाठी फारशी लाभदायक ठरणार नाही, असे आकडेवारीवरून समोर येत आहे.
या मैदानावरील भारतीय संघाची कामगिरीदेखील फार चांगली नाही. या मैदानावर भारतीय संघाला केवळ 3 सामन्यांत विजय मिळाले आहेत. यातील दोन विजय 39 वर्षापूर्वी मिळवले होते. त्यानंतर 2018 साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवला होता. याच मालिकेत भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा इतिहास रचला होता.
भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 ऑस्ट्रेलियाने तर 3 भारताने जिंकले असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. मेलबर्न मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली लढत 1948 साली झाली होती. तेव्हा लाला अमरनाथ भारताचे तर, सर डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते. ही लढत ऑस्ट्रेलियाने 233 धावांनी जिंकली होती. या मैदानावर सलग तीन लढतीत पराभव झाल्यानंतर भारताने 1977 साली पहिला विजय मिळवला. हा भारताचा ऑस्ट्रेलिया भूमीवरील पहिला विजय होता. तेव्हा बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 222 धावांनी विजय मिळवला होता.
या मैदानावर दुसरा विजय 1981 साली सुनिल गावसकर कर्णधार असताना मिळवला. ती लढत भारताने 59 धावांनी जिंकली. त्यानंतर या मैदानावर भारताने सलग 5 लढती गमावल्या. दोन सामने अनिर्णित ठरले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1985 साली झालेली लढतही अनिर्णितच राहिली होती. 2014 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली झालेली लढतही अनिर्णित राहिली होती. 2018 साली भारताने कोहलीच्या नेतृत्वाखाली 137 धावांनी विजय मिळवला होता.