प्रा. रंगनाथ कोकणे
एकीकडे वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य भविष्यात उपलब्ध असेल का, असा प्रश्न असतानाच संपूर्ण जगभरात 30 टक्के अन्नधान्य वाया जाते. युरोप आणि अमेरिकेत वापराच्या स्तरावर अधिक प्रमाणात अन्न वाया जाते तर आफ्रिकेसारख्या देशांमध्ये बाजारापर्यंत पोहोचण्यापूर्वीच एकतृतीयांश अन्नधान्य वाया जाते. जर आपण उत्पादन वाढविले आणि त्याचा मोठा हिस्सा वाया गेला तर ते छिद्र असलेल्या मडक्यात पाणी भरल्यासारखेच होईल.
संपूर्ण जगाची लोकसंख्या आजमितीस 7.7 अब्ज एवढी आहे. या दशकाच्या अखेरीपर्यंत हा आकडा सुमारे साडेआठ अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. येणाऱ्या चार दशकांत भारताची लोकसंख्या 1.7 अब्जांवर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी काळात जगातील अनेक देशांपुढील पहिले आव्हान असेल एवढ्या मोठ्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्याचे. 1798 मध्ये अर्थतज्ज्ञ थॉमस माल्थस यांनी सांगितले होते की, ज्या वेगाने लोकसंख्या वाढते, त्या वेगाने अन्नधान्याचे उत्पादन वाढत नाही. त्यामुळे जगात लोकसंख्येच्या तुलनेत अन्न नेहमीच कमी राहील.
माल्थस यांच्या म्हणण्यानुसार, लोकसंख्येच्या वाढीचा वेग एक ते दोन, दोन ते चार, चार ते आठ आणि आठ ते सोळा अशा टप्प्यांत राहतो तर अन्नधान्याच्या उत्पादनाची गती एक ते दोन, दोन ते तीन, तीन ते चार अशी राहते. म्हणजेच शंभर वर्षांनंतर लोकसंख्येला खाऊ घालण्यासाठी अन्नधान्य कमी पडेल. माल्थस यांचे असे म्हणणे होते की, दुष्काळ, पूर, रोगराई अशा नैसर्गिक आपत्ती लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात, जेणेकरून लोकसंख्या आणि अन्नधान्य यांच्यातील संतुलन कायम राहावे. लोकसंख्या आणि अन्नधान्य उत्पादन यांविषयी माल्थस यांचे हे वक्तव्य कायम चर्चेत राहिले; परंतु ते कधीच वास्तवात उतरू शकले नाही.
एका अहवालानुसार 1960 च्या दशकातील “हरितक्रांती’ हा याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न होता. परंतु भविष्यातील आपली अन्नधान्याची गरज यामुळे पूर्ण होऊ शकणार नाही. आगामी काळात सर्वांचे पोट भरण्याइतके अन्नधान्य उत्पादन होईल का, हा कायम संशोधनाचा आणि चिंतेचा विषय राहिला आहे. भुकेशी लढणे हेच भविष्यात आपल्यापुढील सर्वांत मोठे आव्हान असेल का? अँडी जॉर्विस हे कोलंबिया येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ट्रॉपिकल ऍग्रिकल्चरमध्ये पॉलिसी ऍनालिसिस रीसर्चचे संचालक आहेत.
ही संघटना 1960 च्या दशकात स्थापन झाली होती. वाढत्या लोकसंख्येचे पोट कसे भरायचे या चिंतेने जगभरातील अनेक देशांची सरकारे ग्रस्त असण्याचा तो काळ होता. या समस्येचे निराकरण शोधण्यासाठी संशोधकांनी, सरकारांनी आणि संस्थांनी असा निर्णय घेतला की, आपल्याला अन्नधान्य उत्पादन वाढवावे लागेल. शास्त्रज्ञांनी शेतीच्या पारंपरिक पद्धतीत बदल करण्याबरोबरच क्रॉस-ब्रीडिंग करून उन्नत बियाण्यांचे संशोधन सुरू केले. या प्रयत्नांना हरितक्रांती असे नाव दिले गेले. हरितक्रांतीने आपल्याला पिकांच्या नवीन प्रजाती दिल्या.
अशी रोपे दिली जी अधिक दाणे असलेल्या कणसांचा भार सहन करू शकतील. दहा वर्षांतच अन्नधान्याचे उत्पादन दुप्पट झाले. या क्रांतीने लाखो लोकांचे प्राण वाचविले. भारतात पंजाबसारख्या राज्यांतील शेतकऱ्यांनी उन्नत बियाण्याचा शोध घेऊन गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी दाखविलेल्या मार्गावरून आगेकूच केली आणि पिकाचे उत्पादन वाढवून दाखविले.
संयुक्त राष्ट्रांनी “सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट गोल’मध्ये देशांसाठी 2030 पर्यंत अन्नधान्याची नासाडी निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यात जर यश आले तर यामुळे अन्नधान्याच्या प्रमाणात बरीच वाढ होऊ शकेल. परंतु यामुळे समस्येचे पूर्णांशाने निराकरण मात्र होणार नाही. जर आपण उत्पादन वाढविले आणि त्याचा मोठा हिस्सा वाया गेला तर ते छिद्र असलेल्या मडक्यात पाणी भरल्यासारखेच होईल. आगामी अन्नधान्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी अनेक गोष्टी एकत्रितपणे करण्याची गरज आहे.
बियाण्याच्या बाजारपेठेवर कंपन्यांनी निर्माण केलेली मक्तेदारी, हीसुद्धा धोक्याची घंटा आहे. आजमितीस बियाण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील 60 टक्के हिस्सा केवळ तीन कंपन्यांच्या हातात आहे. आपली पिके रोगप्रतिबंधक असतील, याची काळजी तर आपल्याला घ्यायला हवीच; शिवाय जलवायू परिवर्तनाच्या संकटाशी लढण्याची शक्ती त्यांच्यात असणे गरजेचे असेल. दुष्काळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतही पिके तग धरू शकतील या दिशेने आता संशोधनाचा प्रवास वळला पाहिजे.