पाबळ -करोनावर अद्याप लस सापडलेली नाही. त्यामुळे संपूर्णपणे थांबलेले अर्थचक्र सुरू करण्यासाठी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन, ऑरेंज, रेड झोन तयार करून लॉकडाऊनचे नियम शिथिल करीत करोनासह वाटचाल करा, असे सांगितले जात आहे. करोनासंसर्गाची सावधानता बाळगत, शासन आदेशानुसार वाटचाल करण्याऐवजी काही राजकीय मंडळी आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यापुढे ठेवत “राजकीय पोळी’ भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याची गंभीर बाब ग्रामीण भागातून पुढे येत आहे.
लॉकडाऊनमुळे आधीच नुकसानीच्या चक्रात सापडलेला छोटा मोठा व्यापारी व हातावर पोट असलेला आर्थिक विंवचनेत सापडला आहे. याच नाराजीचा फटका येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकात अनेकांना बसणार याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शासनाने नुकतीच वाहतुकीसाठी एसटी बस उपलब्ध करून दिल्या जाणार अशी घोषणा केली आणि ग्रामीण भागात करोना रुग्ण येणार अशी भावना बळावली गेली. त्यामुळे याच संधीचा फायदा घेत, काही राजकीय कारभाऱ्यांनी, गाव पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय लादला. दरम्यान, शासनाने अशी वाहतूक फक्त राज्य पातळीवरील होणार असल्याचा खुलासा केल्यामुळे ही भीती निरर्थक ठरूनही व्यवहार सुरू करू दिले जात नसल्याचा प्रकार घडत आहे. हीच बाब नाराजीत परिवर्तीत होत असल्याची चर्चा आहे.
शासनस्तरावर आशा वर्कर व आरोग्य खात्याचे कर्मचारी या दृष्टीने रात्रंदिवस काम करत आहे. तर बाहेरगावाहून मूळचे गावचेच अडकलेले नागरिक घराकडे आश्रयाला येत आहेत. अशा नागरिकांची, आरोग्य तपासणी करून गरज वाटल्यास त्यांना विलगिकरणासाठी सहाय्य करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने काही कार्यकर्ते संबंधित शासकीय संस्थांच्या सहकार्याने काम करीत असल्याचा पार्श्वभूमीवर, कथित नेते “दांडगाई’द्वारे शासन आदेशाची पायमल्ली करून लॉकडाऊन लादण्याचा प्रकार करीत असल्याने सर्वसामान्यात नाराजी वाढत आहे.
वास्तविक आरोग्य खाते, पोलीस, तहसीलदार व संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून व जय्यत तयारीत संभाव्य धोक्याला तोंड देत, जनजीवन ताळ्यावर आणण्यासाठी पावले टाकत शासन आग्रही असताना, राजकीय पोळी भाजण्यासाठी जनतेला वेठीस धरण्याची कृती, अन्याय करणारी असून शासनाचा प्रतिनिधी असलेले, पोलीस पाटील, याबाबतीत उदासीनता दाखवत आहे.
ग्रामीण जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न
लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण नियंत्रण शासनाच्या अखत्यारीत होते तर राजकीय क्षेत्रात सामसूम होती. नेत्यांसह कार्यकर्ते अधिवासात होते, आता शासन एकेक टप्पा शिथिलता आणत असताना अनेक कथाकथित नेते बाहेर येत असून आपापल्या डोक्याने ग्रामीण भागात नियम बनवून ग्रामीण भागातील जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.
वेगळ्या भूमिकेची साक्ष
करोनाची लढाई सुरू झाली, त्या घटनेला 40 दिवस उलटून गेले. या दरम्यान बाधितांची संख्या वाढत गेली, त्यात काही गंभीर स्थाने निश्चित केली गेली; मात्र त्या ठिकाणीही तास-दोन तास का होईना नागरिकांसाठी लॉकडाऊनमध्ये दक्षता घेत शिथिलता दिली गेली आहे; मात्र ज्या ठिकाणी एकही रुग्ण नाही अशा ठिकाणी पण आता तास-दोन तास शिथिलता दिली जात नसल्याने ही बाब वेगळ्या भूमिकेची साक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.