Kudal News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जावळी तालुक्यात तापले वातावरण
Kudal News: भाजपच्या आरोपांचा समाचार

कुडाळ – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे जावळी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडी तसेच दोन्ही शिवसेना गटांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या आरोपांचा समाचार घेत, राजकारण करताना भाषेचे भान राखणे आवश्यक असल्याचे सांगितले. जावळी तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले असून शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री याच मातीतले सुपुत्र आहेत. त्यामुळे कोणत्याही नेत्याबाबत बोलताना राजकीय सभ्यता आणि आदर राखला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींवर टीका करण्यापेक्षा विकासकामांचा हिशोब द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. “विकासाच्या नावाखाली नेमका कोणाचा विकास केला जात आहे? सर्वसामान्य जनतेचा की काही ठराविक कंत्राटदारांचा?” असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी काळात ही लढत आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका सुरू असल्याने जिल्हा बँक निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
दरम्यान, तालुक्यातील विकास, शेतकरी, सहकार आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना वैयक्तिक टीका आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
Rohit Pawar: ‘अपना टाईम आ गया..’; प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल





