म्हसवड – माणगंगेला आलेल्या पुराचे पाणी ओसरत असतानाच म्हसवडनजीकच्या दहिवडे मळ्यातील गणेश आप्पा दहिवडे (वय 47) हे गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास यात्रा पटांगणावरील बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेले. ते पाण्यातून घरी जात आसताना तोल जाऊन पडले. मात्र, पोहता येत नसल्याने ते वाहून गेले. ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला, पण त्यात यश आले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दहिवडे मळ्यातील गणेश आप्पा दहिवडे (वय 47) यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास यात्रा पटांगणावरील रथमार्गाच्या मोकळ्या जागेत जेवण केले. त्यावेळी अनेक जण माणगंगेच्या पात्रात आपली वाहने धूत होते. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर गणेश दहिवडे हे घराकडे पाण्यातून जात असताना अनेकांनी पाणी जास्त आहे म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेश यांनी कोणाचे काही ऐकले नाही. ते नदीपात्रातून रथमार्गाच्या मध्यावरुन चालत निघाले होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला. नदीपात्रात चार ते साडेचार फूट खोली होती. गणेश यांना पोहता येत असल्याने ते पंधरा फुटापर्यंत पोहत गेले. म्हसवडचे सपोनि गणेश वाघमोडे यांनी वरिष्ठांना या घटनेची माहिती देऊन सातारा, वाई, पंढरपूर येथील बोटी मागवण्याच्या हालचाली केल्या. नायब तहसीलदार व तलाठीही परिस्थितीचा आढावा घेत होते.