Asthma Action Plan: दमा हा केवळ अधूनमधून होणारा त्रास नसून श्वसनमार्गातील सूज (इन्फ्लेमेशन) हा त्याचा मुख्य कारणीभूत घटक आहे. त्यामुळे केवळ खोकला किंवा श्वास लागणे यांसारखी लक्षणे कमी करणे पुरेसे नसून, श्वसनमार्गातील सूज नियंत्रित करणे गरजेचे आहे. रुग्णांनी तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन व्यवस्थापनाकडे वळणे अत्यावश्यक असल्याचे मत पुण्यातील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ज्ञ आणि सह्याद्री हॉस्पिटलचे कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. राहुल केंद्रे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “दम्यावर सुरुवातीपासून नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक ठरते.अन्यथा वारंवार अटॅक येणे, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणे आणि रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासू शकते. दीर्घकाळ अनियंत्रित राहिल्यास फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.” इन्हेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्स (ICS) हे उपचार श्वसनमार्गातील सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. फक्त शॉर्ट-अॅक्टिंग बीटा-अॅगोनिस्ट (SABA) रिलीव्हर इनहेलर्सवर अवलंबून राहण्याऐवजी कंट्रोलर किंवा अँटी-इन्फ्लेमेटरी इनहेलर्सचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. रिलीव्हर इनहेलर्स तात्पुरता आराम देतात, मात्र आजाराच्या मूळ कारणावर उपचार करत नाहीत. पुण्यातील श्वास क्लिनिक आणि पुना हॉस्पिटलमधील कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. वृषाली खरीद खडके यांनी सांगितले की, “इन्हेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्सबद्दलची भीती निराधार आहे. अनियंत्रित दम्यासाठी जेव्हा ओरल स्टिरॉईड्स घ्यावे लागतात, तेव्हा त्यांचा डोस इनहेलरपेक्षा सुमारे १००० पट जास्त असतो. जर रुग्णाला वारंवार रिलीव्हर इनहेलर वापरावा लागत असेल, तर तो दमा नियंत्रणाबाहेर असल्याचे संकेत आहेत.” भारतामध्ये सुमारे ३५ दशलक्ष लोक दमा या आजाराने ग्रस्त आहेत. लंग इंडिया जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, सुमारे ९० टक्के रुग्णांना आवश्यक असलेले ICS उपचार मिळत नाहीत किंवा ते वापरले जात नाहीत. यामुळे दम्याच्या योग्य व्यवस्थापनात मोठी तफावत दिसून येते. दरम्यान, ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (GINA) 2026 च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फक्त रिलीव्हर (SABA) उपचारांवर अवलंबून राहण्याऐवजी ICS-आधारित उपचार पद्धतीकडे वळण्यावर भर देण्यात आला आहे. डॉक्टरांनी रुग्णांना नियमित वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि कंट्रोलर इनहेलर्सचा सातत्याने वापर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून दम्यावर दीर्घकालीन नियंत्रण मिळवता येईल.